संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन**पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी पालखीसह वारकरी बंधू-भगिनींचे स्वागत केले.*
*संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन*
आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज सातारा जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी उपस्थित राहून पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी पालखीसह वारकरी बंधू-भगिनींचे स्वागत केले. वारकरी बंधू-भगिनींसह या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आनंद वाटला, अशी भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी व्यक्त केली. आजपासून २३ जूनपर्यंत ही पालखी सातारा जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी, तसेच वारकरी बंधू-भगिनींना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे, असे यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी सांगितले.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब होऊन गेला.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, आमदार बाळासाहेब पाटील,आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई दादा, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करुन स्वागत केले.
नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात पालखी सोहळ्यात भाविक तल्लीन झाले होते. विविध विभागांचे सामाजिक संदेश देणारे फलक विशेष लक्ष वेधून घेत होते.
Comments
Post a Comment