युवापिढीत उद्योजकतेची भावना रुजविण्याची गरज : डॉ. पंडित विद्यासागर

युवापिढीत उद्योजकतेची भावना रुजविण्याची गरज : डॉ. पंडित विद्यासागर

कृष्णा विश्व विद्यापीठात राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेस प्रारंभ; देशभरातून ४०० जणांचा सहभाग

कराड, ता. २० : भारताने विज्ञान-तंत्रज्ञानाचे धोरण स्वीकारल्याने भारताचा विकास होऊ शकला. येत्या काळात याच धोरणाला पुढे नेत युवापिढीत उद्योजकतेची भावना रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते.

कृष्णा विश्व विद्यापीठ संलग्न कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ अलाइड सायन्सेस आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा विद्यापीठात ‘जैवतंत्रज्ञान विकास’ या विषयावर आधारित दोनदिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ग्रामीण आणि शहरी भारतातील विद्यार्थ्यांसाठी उद्योग - अकादमी संमेलन’ या शीर्षकाखाली होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन डॉ. विद्यासागर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. तसेच कृषी व नैसर्गिक संसाधने अर्थशास्त्रज्ञ डॉ. परशराम पाटील, कुलपतींचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख, अलाईड सायन्स विभागप्रमुख डॉ. गिरीश पठाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. विद्यासागर पुढे म्हणाले, कृष्णा विद्यापीठात गुणवत्तेला दिले जाणारे प्राधान्य पाहून मला आनंद वाटला. अशा धोरणांमुळेच राष्ट्राचा विकास होत असून, युवापिढील नवी दिशा देण्यात ही परिषद नक्कीच यशस्वी होईल.

संपूर्ण जगाची लोकसंख्या वाढत आहे. इंधन, पाणी अशा अशा नैसर्गिक साधनसंपत्तीचा साठा मर्यादित असून, याचा शाश्वतपणे कसा वापर करता येईल, याचा विचार व्हायला हवा. तसेच पर्यायी इंधन व अन्य साधनसंपत्तीची निर्मिती कशी करता येईल, याबाबतच्या संशोधनाला चालना देण्याची गरज कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केली.

भारताच्या बायो-इकॉनॉमीचा विस्तार करण्यासाठी सकारात्मक दिशा देण्याबाबत सकारात्मक चर्चा या परिषदेत घडावी, अशी अपेक्षा डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. परशराम पाटील, डॉ. नीलम मिश्रा यांचीही भाषणे झाली. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागप्रमुख डॉ. एस. टी. मोहिते, फिजिओथेरपीचे प्रमुख डॉ. जी. वरदराजुलू, नर्सिंगच्या प्रमुख डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सच्या अधिष्ठाता डॉ. स्नेहल मसूरकर, फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या सौ. शुभांगी पाटील यांच्यासह विविध राज्यातून आलेले प्रतिनिधी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट १

भारताच्या विविध राज्यातून शेकडो प्रतिनिधी दाखल

कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेसाठी बिहार, मध्यप्रदेश, आसाम, दिल्ली, पंजाब, हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश अशा भारताच्या विविध राज्यातून शेकडो प्रतिनिधी कराड येथे दाखल झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांसह अभ्यासक, संशोधक व उद्योजकांचा समावेश आहे.



राष्ट्रीय बायोटेक युवा पुरस्कारांचे वितरण

परिषदेत मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय बायोटेक पुरस्कार आणि राष्ट्रीय बायोटेक युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. डॉ. प्रफुल्ल गाडगे (महाराष्ट्र), डॉ. धर्मेश अध्यारू (गुजरात), डॉ. कुणाल काळे (महाराष्ट्र), गिरीश कुकरेजा (महाराष्ट्र), डॉ. गौरव शाह (गुजरात), डॉ. विक्रांत कुलकर्णी (महाराष्ट्र) यांना राष्ट्रीय बायोटेक पुरस्काराने; डॉ. साक्षी भारद्वाज (मध्यप्रदेश), शर्मिला उलगनाथान (तमिळनाडू), श्री. रेवनाथ (मध्यप्रदेश), डॉ. अंशुला शर्मा (हरियाना), देवश्री बोर्थाकुर (आसाम), सयेदा यास्मिन (आसाम), अथिरा (तिरुअनंतपुरम), मृणाल वाघ (तमिळनाडू), रिया बन्सल (पंजाब), भरमजीत दिल्ल, चंदन गौनेकर (गोवा) यांना राष्ट्रीय बायोटेक युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप

कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचा समारोप रविवार दि. २१ मे रोजी समारोप होणार आहे. या समारोप सत्राला राज्याचे उच्चशिक्षण व तंत्रज्ञान मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन  करमळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

फोटो ओळी १ :

कराड : कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेत उद्घाटनप्रसंगी बोलताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर. बाजूस डावीकडून डॉ. गिरीश पठाडे, डॉ. ए. एम. देशमुख, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. परशराम पाटील, डॉ. सुरेश भोसले, डॉ. नीलिमा मिश्रा.

फोटो ओळी २ :

कराड : कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेत स्मरणिकेचे प्रकाशन करताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर व कुलपती डॉ. सुरेश भोसले. बाजूस डावीकडून डॉ. गिरीश पठाडे, डॉ. ए. एम. देशमुख, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. परशराम पाटील, डॉ. नीलिमा मिश्रा.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.