नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे
नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे
जिल्हाधिकारी
सातारा दि. 19 : सातारा जिल्ह्यातील ज्या नागरिकांची आधार कार्ड तयार होऊन दहा वर्ष पूर्ण झाली आहेत अशा नागरिकांनी आपल्या आधार अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी आधार विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
सातारा जिल्ह्यामध्ये आधार अद्ययावतीकरण करण्याची मोहिम वेगवान करण्यासाठी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, विशेष कार्यकारी दंडाधिकारी याबाबत वेळोवेळी आढावा घेत आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत वितरीत केलेल्या 93 आणि महिला व बालविकास विभागाच्या 56 आधार केंद्र चालकांचा आढावा घेण्यात आला असून त्यांना शिबिरांचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने त्यामध्ये अनेक बदल होतात जसे पत्ता, नागरिकांचे बोटांची ठसे, नावामध्ये दुरुस्त्या, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इ. भारतीय विशेष ओळख प्राधिकरण (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया-- युआयडीएआय) यांनी अपडेट डॉक्युमेंट नावाची नवीन सुविधा तयार केली असून माय आधार या अॅपवर अथवा www.myaadhar.uidai.gov.in या संकेत स्थळावर जाऊनही आधार डॉक्युमेंट अपडेट करू शकतात.कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावरही माहिती अद्ययावत करता येते.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना, पुरवठा विभागाच्या शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या विविध सेवा, पीएम किसान, जीवन प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती, सामाजिक लाभाच्या विविध योजना इत्यादी व अशा अनेक शासकीय योजनांसाठी आधार अद्ययावत असणे बंधनकारक आहे.
UIDAI ने टोल फ्री नंबर देखील जारी केला आहे, नागरिकांना आधारशी संबंधित काही समस्या असल्यास, हेल्पलाइन नंबर 1947 वर कॉल करू शकता. नागरिकांना आधार शिबिरांचे आयोजन करावयाचे असल्यास आधार संकलन , जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे संपर्क साधावा.
तरी सर्व नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
0 0 0 0
Comments
Post a Comment